प.प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री नारायण देव तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री शंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज प.पू.श्री नारायण काका महाराज
प.प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री नारायण देव तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री शंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज प.पू.श्री नारायण काका महाराज
गॅलरी ऑडियो / व्हिडिओ माहिती
गॅलरी ऑडियो / व्हिडिओ माहिती

प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज

प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज

P.P. Shri Lokanath Tirth Swami Maharaj

आजच्या बांगलादेशाची राजधानीची ढाकेश्र्वरीदेवी म्हणजे ढाक्क्याची ग्रामदेवता. तेथे वर्षातून चार वेळा नवरात्र उत्सव साजरे होत असतात. अशा या जागृत, संपन्न आणि महान मंदिराच्या पूजेचा मान चक्रवर्ती घराण्याकडे वंशपरंपरागत चालत आला. चक्रवर्ती हे शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन शाखेचे काश्यप गोत्राचे ब्राह्मण होत. त्यांच्या अनेक पिढ्यांनी देवीची सेवा भावभक्तीने केली. प्रत्येक पिढीने पुण्याईचा घडा पुढच्या पिढीच्या हवाली केला. या साऱ्या पुण्याईने साकार होण्याचे ठरविले. पुण्याईने घाई केली तरी प्रारब्धाने वेळ गाठली पाहिजे. आता तीही वेळ गाठली होती. चक्रवर्ती बाबूजींच्या पत्नी धर्मानुकूल होत्या. विशाल मंदिराच्या व्यवस्थेत त्यांचा फार मोठा वाटा होता. सारी झाडलोट, सडासंमार्जन, उपकरणी घासणे, पूजेची तयारी करणे, गोशाळेकडे वैरण पाण्यापासून धारा काढण्यापर्यंत सर्व काही करणे, स्वैपाक-नैवेद्य-सण-समारंभ-अतिथी या गोष्टीकडे लक्ष पुरविणे अशा अनेक कामात आईसाहेबांचा वाटा मोठा होता. कर्तृत्व आणि सेवावृत्ती यांचा मधुर सुसंवाद त्यांच्या ठिकाणी झाला होता. या सर्व कामात कौशल्य, टापटीप व उरकशक्ती होती. याखेरीज त्यांची व्रतवैकल्ये, उपासना नित्याची असे ती वेगळीच!

अशा सात्त्विक मातेला सुपुत्राचे डोहाळे न होतील तरच नवल ! त्या समाधी इतक्या शांत बसून रहात. सिद्धासन, पद्मासन सहज घातले जाई. शरीरात कंप सुरू होत असे. या आनंदात कालीमातेची भजने मधुर स्वरात गात असत. या सर्व गोष्टींच्याकडे चक्रवर्तीबाबूंचे बारकाईने लक्ष असे. त्यांची अध्यात्माची बैठक होती. पत्नीच्या या क्रियांचा अर्थ ते समजू शकत होते. कोण्या महान योगीपुरुषाच्या आगमनाच्या या खुणा आहेत अशी त्यांची खात्री झाली. या स्थितीत त्यांनी होईल तेवढे सहकार्य करून पत्नीच्या वृत्ती सांभाळल्या. त्यांना जीवनाच्या कृतार्थतेची जाणीव होऊ लागली.

कृतार्थी पितरौ तेन धन्यो देश: कुलं च तत् । जायते योगवान् यत्र दत्तमक्षयतां व्रजेत् ॥

असे होता होता वैशाख महिना सुरू झाला. अत्यंत शुभ्र मुहूर्तावर चक्रवर्तीबाबूंना कुलदीपक सुपुत्र झाला. संवत् १९४८, शके १८१४, वैशाख शु. १२ रविवार, हस्त नक्षत्री, कन्या राशीमध्ये चंद्र असताना सकाळी १०॥ वाजता हा मुलगा झाला. तो अमृतसिद्धीचा दिवस होता. बारशाचे दिवशी अनेक धार्मिक कृत्ये करण्यात आली. अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले. सायंकाळी समारंभपूर्वक नामकरणविधी झाला. सुपुत्राचे नाव योगेश्र्वरचंद्र ठेवले. साखर, पेढे वाटले. दानधर्म केला. योगेश अतिशय सुंदर होता. नाक सरळ तरतरीत होते. कुरळ्या केसाचे जावळ चेहऱ्याच्या सौंदर्यात भर टाकीत होते. डोळे मोठमोठे असून कमळाच्या रेखीव पाकळ्यांसारखे होते. सारे सौंदर्य डोळ्यात एकवटले होते. गोबरे गोबरे गाल सुहास्य वदनाची शोभा द्विगुणीत करीत होते. सौंदर्य हा दृष्टीचा विषय आहे. कवटाळण्या चुरगळण्याचा नाही. आनंदाच्या बेहोषातील त्याच्या साऱ्या हालचाली व वाकुल्या पाहणाऱ्यालाही बेहोष करून टाकीत. ज्या मात्यापित्यांचे पोटी योगेशचंद्र जन्माला आला ते पितर धन्य होत.

ढाकेश्र्वरीचे विशाल मंदिर योगेशच्या हिंडण्याला, फिरण्याला व खेळण्याला पुरेसे होई. तो खरा रमून जाई. ढाकेश्वरीच्या समोरच्या सभामंडपात ! त्याला ढाकेश्वरीसमोर नेले की हसू खेळू लागे. वडील पूजा किंवा आरती करीत असले आणि योगेशला तेथे सोडले म्हणजे झाले. तेथून कोठेही तो जाणार नाही, कंटाळणार पण नाही. सारी पूजा, आरती पहात बसणार. मनाशी तसे करीत बसणार. सर्व पुण्याई घेऊन ढाकेश्वरीचा कृपाप्रसाद म्हणून तो आला होता. योगेश तैलबुद्धीचा होता. त्याची ग्रहणशक्ती असाधारण होती. पाहून किंवा ऐकून तो शिके. पाहून पाहून लहानपणीच त्याने पूजेचे तंत्र बिनचूक उचलले. ऐकून ऐकून किती तरी श्र्लोक योगेशने अगदी लहानपणीच मुखोद्गत केले होते. त्याच्या सर्व हालचाली, खेळ स्वत:च्या तंत्राने स्वतंत्र असत. अलीकडे वाढत्या वयाबरोबर खोड्याही वाढत चालल्या होत्या. त्याचा मिष्किलपणा चांगलाच वाढला होता. याबरोबरच लहर लागली की, मंदिराच्या आवारातच रिकाम्या खोलीत जाऊन, स्वारी डोळे मिटून, बसूनही राहत असे. जेवणाच्या वेळी आई जेव्हा मोठ्याने हाक मारी तेव्हा कुठे योगेश ‘आलो’ ‘आलो’ करून बाहेर येई. एकदा तर त्याला आईची हाक ऐकूच आली नाही. इकडे आई हाक मारमारून योगेश ‘ओ’ देईना तेव्हा चांगलीच घाबरली. तिने मुकाट्याने हातातले काम सोडले आणि लागली देऊळभर योगेशला शोधायला. तो कोपऱ्यातील खोलीत बसला असेल ही कल्पना नव्हती. शेवटी निराश होऊन त्या खोलीत आई गेली. तर काय? योगेश नावाप्रमाणे समाधी लावून बसलेला ! आईने त्याला चांगले हलविले, हाक मारली तेव्हा तो ताळ्यावर आला. असा प्रकार मधून मधून होत असे. योगेशला गोसेवेचे बाळकडू आईच्या पोटातूनच मिळालेले होते. योगेश खरा रमून जायचा तो गायींच्या खिलाऱ्यात ! कालवडींशी आणि खोंडाशी अवखळपणे मस्ती करण्यात योगेश दंग होत असे. योगेशचा व्रतबंध आठव्या वर्षी झाला. देवीच्या मंदिरात व्रतबंध लागून योगेश गायत्रीच्या महामंत्राचा अधिकारी झाला. वयाच्या अवघ्या ३२-३३व्या वर्षी बाबूजी देवाघरी निघून गेले. आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी योगेशने एका तागाच्या गिरणीत कारकुनाची नोकरी पत्करली.

त्याच्या हृदयात एकमेव ध्यास लागला होता तो भगवतीच्या दर्शनाचा. जिच्या शक्तीने साऱ्या विश्र्वाची जडण घडण होते, त्या शक्तीची ओळख व्हावी म्हणून तो शोध घेत होता. त्या अनुसंधानाने तो अंतर्मनाच्या विश्र्वकुंजात वावरत होता. देवीचा दृष्टांत आणि प्रचिती यासाठी योगेश या काळात देवीपुढे एकांतात जाऊन बसे. आपली प्रार्थना तिच्यापुढे ठेवी. "आई ! आजपर्यंत जे जग दाखविलेस ते खरे नाही. खोटे आहे. मला तुझ्या ऐश्र्वर्याचे खरे अंतर्जगत् दाखव. ते फक्त विवेक, जागृती आणि सत्संगतीनेच दिसू शकते. तुझ्या कृपेने माझ्यात विवेक जागृती झाली आहे. पण सत्संगतीशिवाय हे व्यर्थ आहे. सत्संगतीशिवाय हा रस्ता चालून जाणे अवघड आहे आणि अशक्यही आहे. मला मार्गदर्शक गुरु दाखव. आई ! तूच गुरू दाखवितेस आणि त्या गुरुकडूनच तुझे स्वरूप स्पष्ट करतेस म्हणून माझी ही प्रार्थना पुरी कर."

एके रात्री त्याला देवीने दृष्टांत दिला. मार्ग दाखवला. गावाच्या, घराच्या खुणा दाखवल्या आणि एका व्यक्तीचे दर्शनही दिले आणि तेथेच स्वप्न संपले. योगेश पुढे झोपला नाही. तसाच उठला आणि देवीला साष्टांग नमस्कार केला. आई-भावंडांकडे निर्विकार मनाने पाहिले व हळूच दार उघडून बाहेर पडला.

इ. स. १९११-१२चा काळ होता. योगेशचे वय वीस वर्षांचे झाले होते. योगेशला ‘शक्तिपात योग’ आणि ‘कुंडलीनी जागृती’ या विषयाची बरीच माहिती मिळाली. त्याने आपल्या गुरुदेवाना दीक्षेसंबंधी एकदा प्रार्थना केली होती. पण ही दीक्षा इतकी सरळ व सोपी नव्हती. श्रीआत्मानंद म्हणाले, "आजन्म नैष्ठिक ब्रह्मचारी राहण्याची तयारी असेल तर दीक्षेचा विचार करता येईल. या विषयात ज्यांना काही प्रयत्न करण्याची इच्छा असते त्यांना दीक्षा दिली जाते. केवळ मजा पाहण्यासाठी दीक्षा दिली जात नाही." योगेशने क्षणाचाही विलंब न लावता आपली तयारी असल्याचे सांगितले. तेव्हा एक शुभ दिवस पाहून आत्मानंदांनी योगेशला नैष्ठिक ब्रह्मचार्याची विधीपूर्वक दीक्षा दिली. या दीक्षेपासून योगेशचे नाव ‘ब्रह्मचारी योगेशचंद्र प्रकाश’ असे ठेविले. या दीक्षेनंतर हे दोघेजण, गुरुशिष्य, ‘विनिटिया’ गावी आले. ‘विनिटिया’ या गावी श्रीनारायणतीर्थदेव रहात होते. त्यांनी तेथे सर्व साधकांसाठी ‘ज्ञान साधन मठ’ स्थापन केला होता. त्या ठिकाणी श्रीमदात्मानंदप्रकाशब्रह्मचारीजी आणि श्रीमत् योगेशचंद्रप्रकाशब्रह्मचारी हे दोघे आले. श्रीगुरु या नवीन शिष्याला घेऊन आपल्या गुरुदेवांच्या घरी आले.

श्रीमदात्मानंदांनी श्रीयोगेशचंद्राचा परिचय श्रीनारायणतीर्थदेवांना करून दिला. श्रीयोगेशचंद्राची सर्व हकीगत सांगितली. माहिती ऐकून व प्रत्यक्ष पाहून त्यांना मोठा संतोष झाला. त्यांनीही आपल्या अनुपम दिव्य दृष्टीने श्रीयोगेशचंद्राला कृतार्थ केले. परम कल्याणकारी मंगल आशीर्वाद दिला. येथे योगेशचंद्रांना श्रीमदात्मानंदांकडून शक्तिपात दीक्षा झाली. टिहरीच्या जंगलात स्वामी चिन्मयानंदांनी अज्ञातामध्ये साधना केली.पुढे "तिच्या" आदेशानेच स्वामी होशिंगाबादला आले. पुढे बार्शी, पुष्कर, काशी, उज्जैनी, गया येथेही प्रयाण केले. इ. स. १९२५ला स्वामींचा १२वा चातूर्मास बार्शीत पार पडला. स्वामीजी विनोदी स्वभावाचे होते. बार्शीतील चातुर्मासात जीवनमुक्ती ग्रंथावर विवेचन केले. महाराष्ट्रात अंतरंग दौरा स्वामींनी केला. १९२७ साली सद्गुरू चिन्मयानंद स्वामींनी आपले गुरू श्री १०८ प. प. श्रीशंकरपुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराजांकडून दंड घेतला व त्यांचे नाव प. प. श्रीलोकनाथतीर्थ असे झाले. १९५३च्या मे महिन्यात आपल्या देहपाताचा योग असल्याचे सद्गुरू श्रीलोकनाथतीर्थस्वामींना जाणवले. त्यासाठी त्यांनी आपल्या निकटच्या काही शिष्यांना बोलावूनही घेतले. त्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री दहानंतर स्वामिश्रींची प्रकृती एकदम अस्वस्थ झाली व सर्व गंभीर झाले. स्वामींच्या मुखावर मात्र शांत स्मित विलसत होते आणि नारायणनामाचा मंद उच्चार चालू होता. इतक्यात स्वामींचे डोळे विस्फारले गेले व लगेच घट्ट मिटले गेले. शेजारीच बसलेल्या वामनरावांचा हात त्यांनी घट्ट धरून ठेवला होता. स्वामींचा देह थरथर कापू लागला. सगळेजण आतुरतेने पहात होते. स्वामी निश्र्चेष्ट झाले. सर्वांनी आशा सोडलीच. पण तेवढ्यात त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या ओठांची हालचाल पाहून महाराजांनी आपले कान जवळ नेले, स्वामी म्हणाले, "वामन ! वे चले गये." गंडांतर टळले होते.

यानंतर साधारण नऊ महिन्यांनी दि. ९ फेब्रुवारी, १९५४ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सद्गुरु लोकनाथतीर्थ स्वामी महाराज अत्यंत क्षीण अवस्थेतही शिष्यांच्या मदतीने उठून सिद्धासनावर बसले. गंगाजळ घेऊन भस्मलेपन करविले. रुद्राक्षमाळा धारण केली आणि सर्वांना खोलीबाहेर पाठविले. त्यांनी केलेला ॐकार दोन वेळा बाहेर ऐकायला आला. तिसरा प्रणव बहुधा अंतरातच विलीन झाला. अर्ध्या तासाने शिष्यवर्गाने खोलीत प्रवेश केला तेव्हा स्वामीमहाराजांचा देह अचेतन होता..

प. पू. लोकनाथतीर्थ स्वामीजींनी साधनेसंबंधी, शक्तिपात दीक्षेविषयी बरीचशी माहिती दिलेली आहे. ती अशी,

१. हे शास्त्र फार नाजूक आहे. येथे एकही गोष्ट लपून राहत नाही. एकही दोष शिल्लक राहत नाही. जे काही असेल ते उफाळून बाहेर येईल. ही दीक्षा आहे. ही दिव्यत्व देते. पापक्षालन करते. म्हणून तर साधक शुद्ध होत जातो. साधना करताना काळजी करण्याचे कारण राहत नाही. क्वचित प्रसंगी, धोक्याचे प्रसंग आले तरी दयाघन कुंडलिनी-जगदंबा मातेच्या कृपेने हे सर्व दूर होते. जसा साधकास त्रास भोगावा लागतो. त्याचाच परिणाम म्हणून सद्गुरूंनाही त्रास भोगावा लागतो.
२. शक्तिपात हे एक महान साधन आहे. सर्व साधनमार्गांपेक्षा हा साधनमार्ग प्रखर, गतिमान आणि बिनधोक आहे. अन्य सारे साधनमार्ग कल्पनांतर्गत आहेत, तर शक्तिपात साधनमार्ग 'कल्पनातीत' आहे.
३. प्रत्येक ग्रहणामध्ये साधकांनी आपले साधन जरूर केले पाहिजे. अशा वेळी शक्तिसंचाराचा उत्तम अनुभव येत असतो. अनेक विक्षेपांचा नाश होण्यास मदत होते. असलेले प्रतिबंध दूर होतात. साधनेची गती वाढते व साधक पुढे पुढे गतिमान होत राहतो.
४. सद्गुरुंना अंत:प्रेरणा झाल्यास अगर होत असल्यासच ही 'दीक्षा' मिळते. अन्यथा काही काळ जावा लागतो.
५. प्रपंचातील अडचणींच्या मागे दडून साधनेकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. त्या अडचणी प्रत्येक प्रपंच, संसार करणाऱ्यांच्या पाठीमागे लागलेल्या आहेतच. त्यातून सुटण्यासाठीच तर हा मार्ग आहे. आम्ही तुम्हाला संसार सोडायला सांगत नाही, तो आपोआप तुमच्याकडून सहजपणे कसा सुटेल हे पाहात असतो. तुम्ही प्रपंच करा, संसार करा, शिका, पैसे मिळवा. काय इच्छा होईल ते करा, पण घेतलेले दिव्य, अपूर्व महान व दुर्मिळ साधन आहे. ते एकदाही चुकवू नका. एवढे केले की, तुमच्यात काय फरक पडतो ते तुम्हीच पाहा. तुम्ही फक्त साधनेला बसा. तुमच्याकडून हे साधन योग्य ते सर्व काही करवून घेईल.
६. साधनेत निराशेचे विचार येतात ! मुळीच चिंता करू नये. साधना रोज करीत जा. ही निराशा आपोआप निघून जाईल. ही साधना मिळालेला साधक तीन जन्मांच्या आत पूर्ण होऊन मुक्त होतो. साधनेस बसताना, श्रीदत्तगुरु व इष्टदेवतांना नमस्कार करून साधन निर्विघ्नपणे चालावे अशी प्रार्थना करून बसावे.
७. चित्त आणि प्राणवायू यांची स्थिरता होऊ लागल्यास अनुभव येत राहिला म्हणजे साधना चांगली चालली आहे याची खात्री बाळगा.
८. आज्ञाचक्राचा भेद होण्यास काही काळ लागतो, लागत असतो. थोडा वेळ जास्त लागतो म्हणून मुळीच निरुत्साहि होऊन चालणार नाही. साधना सतत चालू ठेवावी.
९. आम्ही कुंडलिनी शक्ती जागृत करतो. त्यानंतर तिचे कार्य सुरू होते. शक्ती जागृत होऊन तिचे कार्य सुरू झाले की, ती प्रथम साधकाचे अनंत जन्मीचे पाप जाळून टाकण्यातच्या उद्योगाला लागते. ही शक्ती म्हणजे अग्नीचा स्फुल्लिंग आहे. तो सर्व पापराशी भस्मसात करीत जातो. हे कार्य अनेक दिवस प्रसंगी काही जन्म, चालू राहते. साधक निर्दोष होऊन साधनसंपन्न होता होता त्याच्या चित्तामध्ये स्थिरता येऊ लागते. चित्ताची स्थिरता याच साधनाने वाढत जाते आणि चित्ताला एकाग्रता येऊ लागते. यापुढे तो समाधीचा अनुभव घेऊ शकतो.

अशा या जीवनमुक्त महात्म्यास कोटीकोटी प्रणाम.